१६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर प्राणघातक हल्ला झालेल्या त्या तरुणीबद्दल मला कणव वाटते. असे घडायला नको होते, पण असे म्हणजे कसे? माझ्या मते त्या घटनेचे दोन भाग आहेत. ही तरुणी आणि तिचा प्रियकर बसमध्ये चढल्यानंतरचे दोन तास हा एक भाग आणि बसमध्ये चढण्यापूर्वीचे तीन तास हा दुसरा भाग झाला. सध्या जे चालू आहे ते म्हणजे इंडिया गेटवर मेणबत्त्या जाळणे आणि ‘बलात्कारियोंको फॉंसी दो’, असे बेंबीच्या देठापासून ओरडत म्हणायचे यातून फक्त पेपरात आणि चॅनलवर छबी दिसते. यातून बलात्कार थांबेल असे समजणारे मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. बसमध्ये चढण्यापूर्वीच्या २ तासांचा विचार न करणे म्हणजे रोग रेड्याला मलम पखालीला असा प्रकार होत आहे. तो जाणूनबुजून होत असेल तर बलात्काराचे प्रमाण घटण्याऐवजी वाढत जाणार हे नक्की.
दिल्लीमध्ये गेले ८ दिवस झालेल्या तरुणाईच्या दर्शनाने अनेकजण भारावले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अण्णांच्यामुळे दिल्लीकर असेच रस्त्यावर उतरले होते त्यावेळी मी पण भारावून गेलो होतो. भ्रष्टाचार निपटून काढणारे सशक्त लोकपाल विधेयक हा त्यावेळी ठोस मुद्दा होता. आत्ता या गर्दीपुढे मुद्दा काय? बलात्कार्यांना फाशी द्या ही अशी रस्त्यावर करायची मागणी आहे का? घटनादुरुस्ती संसदेत होते की इंडिया गेट, जंतरमंतरवर? दुसरा मुद्दा दिल्ली पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा. ते आहेतच. पण या प्रकरणात ते दोषी आहेत असे ज्यांना वाटते त्यांनी देशातील ज्या शहरात बलात्कार होत नाहीत त्या शहरातील पोलीस दिल्लीत आणून बसावावेत. त्या मुलीबद्दल सहानुभूती दाखवायची तर एक दिवसच मूकमोर्चा, मेणबत्ती मोर्चा काढणे सांयुक्तिक होते, पण ब्दादिमिर पुतीन हे पाहुणे दिल्लीत असताना आणि खाजगी गाड्यांची मोडतोड करत पेटवत हे जे आंदोलन पुढे चालले. ती धूळवड आहे. ही भरकटलेली दिशाहीन तरुणाई आहे.
बलात्काराचे दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे मुंबईची परिचारिका अरुणा शानबागसारखा ड्युटीवर असताना वॉर्डबॉयने एकटी पाहून हे कृत्य केले वर तिच्या डोक्यावर प्रहार केला. गेली ५० वर्षे ती जिवंत आहे, पण मृतवत यात अरुणाचा कणभरही दोष नव्हता अशी प्रकरणे किंवा घरात एकटी बाई हे कळल्यावर घरात घुसणे, ग्रामीण भागात पाणी आणण्यास गेलेली किंवा शेतात खुरपणी करत असलेली किंवा जळण गोळा करत असलेल्या स्त्रीवर बलात्कार झाला तर त्यासाठी फाशीच्या तरतुदीचा कायदा जरूर व्हावा. वरीलपैकी महिला गंमत म्हणून बाहेर पडत नाहीत किंवा रात्री बेरात्री हिंडत नाहीत. ग्रामीण भागात रात्री ९-३० ला आडवाटेला किंवा उसाच्या फडात एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर गावकर्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल. ‘ही बया रातच्याला तिकड कडमडलीच कशापायी’ मात्र हाच प्रश्न दिल्लीतील त्या तरुणीला, हॉस्टेलपासून दूर, तेही प्रियकरासोबत रात्री ९-३० पर्यंत ती काय करत होती असा प्रश्न कोणीच विचारणार नाही. अशा समस्यांचे मूळ येथेच आहे. तेच दुर्लक्षित ठेवले जाते. रेणुका चौधरी, जयंती नटराजन, गिरीजा व्यास या कॉंग्रेसच्या तोंडाळ बायका आज तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत. आता बोलायला त्यांना थोबाडच नाही, पण याच भवान्या ३ वर्षांपूर्वी प्रमोद मुतालिक यांच्यावर तुटून पडल्या होत्या. प्रमोद मुतालिक यांना तालीबानी म्हणणारे आज कोठे शेण खात बसले आहेत. कॉलेजच्या नावाखाली पबमध्ये जाऊन दारू पिऊन मुलांबरोबर धांगडधिंगा करत असलेल्या पोरींना बाहेर ओढून घरी पोहोचवले यात श्रीराम सेनेचे काय चुकले. दुपारचे हे चाळे हॉस्टेलवर गेल्यावर रात्रीचे चाळे होतात. दिल्लीत तसेच झाले आहे. रात्री ९-३० पर्यंत प्रियकराबरोबर ती बाहेर कशासाठी होती हे उघड आहे. पबमध्ये दारू पिऊन नाचणे आणि रात्री बेरात्री भटकणे याला स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे, तर या स्वातंत्र्याची कटू फळेही आनंदाने स्वीकारली पाहिजेत. कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध नसते ही गोष्ट विसरून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार या विचारप्रणालीला खतपाणी घालण्याचा हा परिणाम आहे. रेणुका चौधरी, जयंती नटराजन, गिरीजा व्यास या तिघी आणि त्यांचे समविचारी हे १६ डिसेंबरच्या आणि इथून पुढे होणार्या प्रकारांना जबाबदार आहेत. दिल्ली पोलिसांना दोष देऊन आणि दोन अधिकारी बडतर्फ करून बलात्कार थोडेच थांबणार आहेत.
ते खरोखरच थांबवायचे असतील तर मुलींच्या आईबापांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत. मुलीला मुलासारखे वाढवणे ही खुळचट कल्पना आधी डोक्यातून काढून टाका. मुलगा रात्री १२ वाजता घरी आला तर फार तर झिंगून येईल. नाही तरी मद्यपानाला आता प्रतिष्ठा आहेच, पण मुलगी रात्री १२ वाजता घरी आली तर शेण खाऊन आली का हे कसे कळणार. एका मुलीवरील बलात्काराने देशात एवढा गहजब होत असेल तर तो साफ चूक असेल किंवा मुलींना सुरक्षित बंदोबस्तात ठेवणेच आवश्यक आहे. स्त्री सुशिक्षित असली पाहिजे हे मान्य. मग दहावीपर्यंतचे शिक्षण पुरेसे आहे. कॉलेज म्हणजे ट्युशन, ट्रिप, हॉटेलिंग असे समीकरण आहे. उडाणटप्पू पोरी याचाच गैरफायदा घेतात. आपली पोरगी उडाणटप्पू आहे असे कोणताच बाप मान्य करणार नाही. तिने तोंडाला काळे फासले की ढसाढसा रडणारे अनेक बाप मी पाहिले आहेत. त्यावेळी सर्व घडून गेलेले असते. आपल्या घरी दिल्लीसारखा विपरीत प्रकार घडू नये असे वाटत असेल तर प्रतिगामी, पाखंडी, तालिबानी या शब्दांची जळमटे डोक्यातून काढून आधी फेकून द्या. ग्रामीण भागातील लोक करतात तसा स्त्री शिक्षणाच्या मर्यादेचा विचार करा. काही झाले तरी शहरातील हॉस्टेलवर अजिबात ठेवू नका. हॉस्टेलवर राहणे म्हणजे स्वैराचार. घरी आपल्या नजरेसमोर ठेवून जेवढे स्वातंत्र्य देता येईल तेवढेच द्या. मुख्य म्हणजे तिच्या हातातील मोबाईल प्रथम जप्त करा. आज हे सल्ले हास्यास्पद, दोषास्पद वाटतील. तरण्याताठ्या पोरीकडून घर उद्ध्वस्त झाले, गावात नाचक्की झाली की मग आमचे चुकलेच, या गोष्टी आधी करायला हव्या होत्या असे उद्गार ऐकायला मिळतात.
दिल्लीतील १६ डिसेंबरच्या प्रकारावर विचार करताना दोष त्या तरुणांचा, दोष ढिसाळ न्यायव्यवस्थेचा, दिल्ली पोलिसांचा तसेच चौथा दोष खुद्द त्या तरुणीचा हेही मान्य करायला हवे. हा चौथा दोष दूर केला तर बाकीचे तीन आपोआप दूर होतात. मात्र तो तसाच कायम ठेवून इतर ३ दोषांवरच आदळआपट करत राहिलो तर परिस्थिती तसूभरही बदलणार नाही सध्या नेमके तेच होत आहे.
Posted by : AMAR PURANIK | on : 22 Jan 2013 Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry
Anonymous
22 January 2013 @ 10:51 pm
नमस्कार,
तुमच्या इतर लेखातील खूप मुद्दे पटतात व कमी पटत नाहीत. परंतु या लेखातील खूप मुद्दे पटले नाहीत व कमी पटले. लेख फारच विसंगत वाटला.